महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा
"विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
बिळात पळती, सर्पावत"
हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.
म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.
म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.
सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.
महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................
१) पत्नी धर्म
२) सेवक धर्म
३) राज धर्म
४) कुल धर्म
५) वर्ण धर्म
६) व्यवसाय धर्म
१) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.
म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.
२) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.
३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.
महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.
म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'*
आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.
मुजफ्फरभाई सय्यद
कार्याध्यक्ष
अ. भा. साहित्य कलामंच
९९६०३२५०५७
वाचा -
महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...
सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....