इतिहास किती विक्रुत कराल ?
मुस्लिम राजवट व समानता
हिंदू मुस्लिम यांचे धार्मिक आचार - विचार जरी भिन्न होते तरी त्यांनी कधी एकमेकांचा द्वेष केला नाही व याला पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील - प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरी प्रसाद.
सद्य परिस्थितीचा विचार केला तर एक गोष्ट चटकन लक्षात येईल की, आज देशापुढे अनेक बिकट प्रश्न उभे आहेत परंतु काही स्वार्थी व राजकारणी लोकसत्ता हस्तगत करण्यासाठी तर काही आपली सत्ता टिकवण्यासाठी जातीयतेचा आधार घेत आहेत. देशातील शांत व पवित्र वातावरण सतत तापत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधीच दारिद्र्य, उपासमारी, विघटनवादी शक्तींनी देशाला पछाडले आहे व त्यातच भर म्हणून मशिद, मंदिर या वादाला ज्वालामुखीचे रुप देण्याचे दुष्ट प्रकार सुरु आहेत.
इतिहासाचा विपर्यास केला जात आहे. अशाच काही गोष्टींवर प्रकाश टाकणारे हे विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या 'हिंदुस्तान का मुस्तकबिल' या प्रसिद्ध पुस्तकातून वेचणेत आले आहेत.
'हर शाख पे उल्लू बैठा है, अन्जामें गुलिस्ताँ क्या होगा'
अशी सध्या स्थिती आहे. डॉ. बाबूंच्या लिखाणातून आम्ही काही धडा घेऊ हीच अपेक्षा.
ज्याकाळी भारतात मुस्लिम बादशाहचा अंमल होता त्या काळाचे एक ठळक वैशिष्ट्य हे आहे की, त्या वेळेस धार्मिक द्वेषाचे, जातीद्वेषाचे किटाणू समाजात मुळीच नव्हते. मुस्लीम राजवटीत अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात हिंद व हिंदू राज्यांच्या अंमलाखाली असलेल्या क्षेत्रात हिंदू, मुस्लिम दोन्ही समाज एकोप्याने, सलोख्याने सुखनैवपणे जीवन जगत होते. प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरी प्रसाद आपल्या 'तारीखे हिंद' या पुस्तकात लिहितात की, 'हिंदु - मुस्लिम यांचे धार्मिक आचार - विचार जरी भिन्न होते तरी त्यांनी एकमेकांचा द्वेष केला नाही की असूया बाळगली नाही. याला पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील. जसे मुस्लिम बादशहांनी हिंदूंना व हिंदू राजांनी मुसलमानांना आपल्या क्षेत्रात त्यांच्या धार्मिक स्थळांना, मंदिरांना दिलेल्या देणग्या, जहांगिऱ्या दिल्याचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. ज्या लोकांना इतिहास विषयी आवड आहे किंवा जे सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारे आहेत. अशा इतिहासप्रेमी मंडळींना दक्षिण भारताच्या इतिहासात अशा घटना पदोपदी आढळतील. ज्या आदिलशाही व कुतुबशाही घराण्यांनी हिंदूंच्या कित्येक धार्मिक स्थळांना मोठमोठ्या जहांगिऱ्या व देणग्या बहाल केल्याचा उल्लेख सापडतो. खुद्द मलाच माहीत असलेली दोन उदाहरणे इथे नमूद करतो. क्षेत्र गया येथील बुद्ध महंत यांना प्रदान केलेला मोठा जमीनजुमला की ज्याचे वार्षिक उत्पन्न लाखाहून जास्त आहे. ही देणगी त्या महंताला दिली होती. दिल्लीच्या महंमदशाह याने त्याचबरोबर एका फर्मानद्वारे 'मस्तीपूर ताखय्या' नावाचे गाव महंत लालगीर यांना देण्यात आले. महंत लालगीर हे बौध्दधर्माचे उपदेशक व पंडितही होते. त्याचप्रमाणे 'दरभंगा' येथील विस्तृत व भव्य असा जमीन - जुमला जो बहुधा भारतातील सर्वात मोठा जमीन जुमला गणला जातो. तो सम्राट अकबराने तत्कालीन ब्राह्मण महाराज, अधिराज यांच्या पूर्वजांना त्यांच्या विद्ववत्तेवर खूष होऊन बहाल केला होता.
ज्ञानाची ओढ आपल्या प्रजेत निर्माण करण्याकरिता 'शेरशाह याने आपल्या हिंदू प्रजेस त्यांच्या शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य देऊन शिक्षणाला उत्तेजन दिले. (मुस्लिम रोल इन इंडिया) अशाच प्रकारे मुस्लिम बादशहांनी अन्य धर्मियांना दिलेली समानतेची वागणूक ही सुद्धा उल्लेखनीय आहे. याचे उदाहरण म्हणून डॉ. सय्यद महामूद यांनी माझ्याशी चर्चा करताना म्हटले होते की, 'काश्मीरचे सुलतान जैनुल आबिदीन यांनी अमरनाथ व शारदादेवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कित्येक विश्रांतीग्रुहे उभारुन येणाऱ्या यात्रेकरुंसाठी त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे नजिबाबदच्या पठाणांचा १७८० मध्ये हरिद्वार वर सत्ता होती. तेव्हा पठाण नवाबांने हरिद्वारेस येणाऱ्या हिंदू यात्रेकरुंसाठी त्यांच्या सुखसोयींकरिता भव्य अशा धर्मशाळा आजतागायत असून त्यांचा ताबा हिंदूंकडेच आहे. १५८८ मध्ये गुरु अर्जुनदेव यांनी अम्रुतसरला एक तलाव खोदून त्याचवर्षी पूजा - अर्चेकरिता मंदिरांची स्थापना केली. या मंदिराचा पाया मियाँ मीर उर्फ बालपिर या मुस्लिम विद्वानाच्या हस्ते रचण्यात आला आहे. हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.
'सजानराव' हे औरंगजेब कालीन इतिहासकार. त्यांनी लिहिलेल्या ' खुलास्ते तवारीख' मधील दोन - तीन घटनांचा येथे उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. या ग्रंथात सजानराव लिहितात, 'दिपादाल' हे गाव कलानूरच्या जवळ आहे. त्याच गावी प्रसिद्ध औलिया शाह शम्सुद्दीन दरबारी रह. यांची मजार आहे. शाह शम्सुद्दीन हे एक सत्पुरुष होते. त्यांनी हिंदू - मुस्लीम भेद न करता सर्व धर्मियांना समानतेचा उपदेश केला. त्यांच्या शिष्यगणात सर्वधर्मी लोकांचा भरणा होता. 'दिपाली' नावाच्या एका हिंदू शिष्याची श्रद्धा शाहबाबांवर इतकी जबरदस्त बसली होती की पुढे चालून शाहसाहेबांचा पट्टशिष्य होण्याचा बहुमान त्यासच मिळाला. शाहबाबांच्या म्रुत्युनंतर दर्ग्याची देखभाल करण्याचे कार्य दिपावलीवरच येऊन पडले. यावर काही मुस्लिमांनी आक्षेप घेतला परंतु औरंगजेब आलमगिरच्या सत्तेने तो आक्षेप धुडकावून दिला व दिपाली यालाच त्या दर्ग्याचा कर्तुम कर्तुम म्हणून घोषित केले. अशाच प्रकारे ओरंगजेबकालीन दोन देणगी स्वरुपाच्या फर्मानाकडे आपण नजर टाकूया. ज्यामध्ये एक फर्मान प्रसिद्ध नाथांच्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या पक्षात असून दुसरे गिरधर वल्द जगजीवन (राहणार. बस्ती बनारस) तसेच जधो मिश्र (रा. महेशपूर परगणा हवेली) आणि पंडित निहालचंद्र मिश्र या नावाने आहे. वर नमूद केलेल्या तिन्ही महंतांना जहांगिऱ्या प्रदान करण्याचा आदेश या फर्मानात दिलेला असून या जहांगिऱ्या बहाल केल्या औरंगजेबांनी. त्याचबरोबर नगदी १०० रुपयांची देणगी म्हणून श्री. कल्याणदास मिश्र (सुलतान) यांनाही देण्यात आली.
परमधर्मीविषयी आदरपूर्व द्रुष्टीकोन बाळगणारा सुलतान महमंद यांचा तर हटकून उल्लेख करावासा वाटतो. सुलतान महमंद यांने तर ११५३ मध्ये उज्जैन येथील महाकाली देवीच्या मंदिरातील दिवा सतत प्रज्वलित रहावा यासाठी आपल्या मोदी खान्यातून दररोज ४ शेर शुध्द तूप पुरविण्याची व्यवस्था केली होती. भिन्न धर्मियांना समानतेची वागणूक मिळावी, देशातील एकता टिकावी म्हणून न्यायदानाच्या बाबतीत पक्षपाती भूमिका न घेता त्या त्या धर्मानुसार प्रजेस योग्य न्याय मिळावा अशी तळमळ बाळगणारा बाबर व त्याचे म्रुत्यूपत्र आजही आम्हास इतिहासात आढळतो, ज्याचा या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगानुरुप होईल. बाबर आपल्या म्रुत्यूपत्रात आपल्या पुत्रास ( हुमायून) उपदेशितो की, 'प्रिय पुत्रा हिंदुस्थानातील लोक भिन्न, भिन्न पंथात विभागलेले आहेत. त्यांचे सर्वश्रेष्ठ अल्लाह) शतशः आभार मान की, त्याने तुला या लोकांचा राजा बनविले. आता तुझे हे कर्तव्य आहे की, आपल्या मनातून धार्मिक द्वेष पुसून टाक व प्रत्येक धर्मानुयायांचा न्याय कर अन् न्यायही असा करावा की, राजा प्रजेवर व प्रजा राजावर खूष राहील. केव्हाही कोणत्याच धर्माच्या अनुयायांचे त्यांच्या धार्मिक स्थळांचे अवमूल्यन करु नकोस व भिन्न भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करुन दे जेणेकरुन विश्वास, एकता, सलोखा निर्माण होईल. (मोरखायकमजमादिल अव्वल ९३५ हिजरी, बाबर की वसियत) या भाषांतराची एक प्रत डॉ. बालक्रुष्ण, प्रिन्सिपाँल राजाराम काँलेज, कोल्हापूर यांच्याकडे होती. संदर्भ (दै. सर्चलाईट दि. ३० मे १९२६)
वरील निवडक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या 'हिंदुस्तान का मुस्तकबिल' या प्रसिद्ध पुस्तकातून वेचणेत आले असून डॉ. बाबूंनी या ग्रंथाची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी केली होती. क्रुपया वाचकांनी याची नोंद घ्यावी
"का आळ खंजीरावर
घेता तुम्ही खुनाचा
का वाटतो तुम्हाला
तो सोयरा असावा"
मुजफ्फरभाई सय्यद
कार्याध्यक्ष
अ. भा. साहित्य कलामंच
९९६०३२५०५७
वाचा -
शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...
विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan...
मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION...
No comments:
Post a Comment