युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -रियाज़ सैय्यद
अहमदनगर - रक्त हे कोणत्याही फॅ क्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत असल्याने एका रक्तदात्याचा अनेकांना फायदा होत असल्याने या पुण्यकार्यात सहभागी झाले पाहिजे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे इतरांनाही रक्तदानाची प्रेरणा मिळणार आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन पॉप्युलर फ्रंटचे रियाज सैय्यद यांनी केले.
कोरोनाच्या आजारामुळे सध्या रक्तदान शिबिरे व रक्तदात्यांची फार कमतरता होत असून शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने मौलाना आझाद रोड येथील मिसगर डायग्नोस्टिक सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदान केले.
यावेळी शेख हुजेफा म्हणाले, आज प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे झाले आहे, त्यामुळे रस्ते अपघाताबरोबरच इतरही अनेक कारणांनी रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. अशा परिस्थिती प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वर्षभरातून एकदातरी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून रक्तदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. सर्व रक्त संकलन करणारे व रक्तदात्यांचे शेख हुजैफा यांनी आभार मानले.
या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी व अर्पण ब्लड बँकेने केले. या शिबिरात 82 जणांनी रक्तदान केले. सामाजिक उपक्रम करताना पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे वतीने कोवीडच्या काळात निराधार अनाथ लोकांचे अंतिम संस्कार ही केले.