लेखणी परिवर्तनाची
जडणघडणाची नितांत गरज
कुशल संघटन यशस्वी पक्षाचा आत्मा असतो, संघटन बांधणी वरच पक्षाला सोन्याचे दिवस येतात.
संख्या,सत्ता आणि सत्य ह्या तीन शक्ती आहेत आणि त्या पुष्कळदा परस्पर विरोधातही उभ्या राहिलेल्या दिसतात.संख्या आणि सत्ता असणाऱ्यांनी सत्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न केल्याचे नेहमीच दिसते.पण सत्याला पराभूत किंवा कायमस्वरूपी पराभूत करण्याची शक्ती,क्षमता वा सामर्थ्य संख्या आणि सत्ता यांच्यात नाही,याची ग्वाही इतिहास देतो याचे भान कोणीच विसरू नये.
माणसे बदलतात ही मूलभूत श्रध्दा आहे, माणसे परिस्थितीवश बदलतात, त्याचप्रमाणे विचारांची प्रक्रिया सुरु झाल्यानेही बदलू शकतात.मग युक्तिवाद व अर्धवटपणाचा जन्म होतो किंवा दुबळेपणाचे तत्वज्ञान उद्यास येतात आणि मग तो कसा टिकून रहावा याची धडपड चालू होते,पण शेवटी निष्कर्ष हाच की हा सर्व खटाटोप म्हणजे अर्धवटपणाचे जाहिर शिफारसपत्रच होय.मुळातच मनोगंडातून बाहेर पडण्यासाठी फार मोठे बौद्धिक सामर्थ्य लागते आणि ते सर्वजण दाखवताच असे नाही.
समाज प्रबोधन आणि नूतन विकल्प उभा करताना बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात अशा वेळी " कुतरं भुकत वाको भुकवा दे (कुत्र भुंकतो******)" हे लक्षात घेऊन टिकाकारांना दुर्लक्षित करणे कधीही योग्यच!
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारणे या कोणाच्या तरी भावनिक आवाहनाला प्रतिसाद देणे वा अशा आवाहनाला बळी पडून संघटन बांधणी यशस्वी होत नाही, तर निकोप चर्चा, वादविवाद वगैरे अवास्तव व अनावश्यक बाबीं असल्यातरी यांचा विचार करणे अनिवार्य आहे.
आजच्या घडीला नुसत्याच महापुरुषांच्या नावाने घोषणा देणे, धार्मिक घोषणा देणे व विशिष्ट रंगाचे झेंडे विशिष्ट समुहाचे प्रतिक म्हणून गोंडा हलवणे हे शहाणपणाचे द्योतक नाही तर एखाद्या संघटनेच्या स्वरूपाचे आणि तिच्या स्थापनेमागील उद्दिष्ट्यांचे आकलन न होताच संघटनेकडून केलेल्या अपेक्षा या अप्रस्तुत ठरु शकतात.यासाठी पक्षाचे उद्दिष्ट माहिती असणे आवश्यक आहे.
समाज आणि संघटना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण त्यांची उभारणी मानवी "न्याय" तत्वावर झाली पाहिजे व या "न्याय" तत्वाला समतेचे अधिष्ठान असले पाहिजे असे तत्वप्रणाली मानतात.
न्याय सोडून समाज व संघटना हाताळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला,तर विचारांचा भोंगळपणा व तर्कदृष्ट्या तपासण्याचे भान राहत नाही व अंतत: मनस्तापाशिवाय काहीच शिल्लक उरलेले नसते.
ज्यावेळी समाज आणि संघटना या विषम भौतिक पायांवर उभ्या राहतात तेव्हा समाजजनतेची अव्याहतपणे पिळवणूक होते,व त्यातून एक शापित पिढी व संघटन निर्माण होते. ज्यातून निव्वळ आणि निव्वळ बाजारबुनगे, हुजरेगिरी करणारे किंवा व्यवस्था भ्रष्ट करणाऱ्या व व्यवस्थेवर डल्ला मारणाऱ्या टोळ्या निर्माण होतात.
बहुसंख्य सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक किंवा भावनिक आवाहन करुन संघटना व समाज ह्या मजबूत होत नाहीत, तर त्यातून एक राक्षसी नेतृत्व जन्माला येते आणि त्यातूनच पुढे दलाली नेतृत्व समाजात मिरवू लागते.
सत्ता केंद्र आपल्या हातात ठेवण्यासाठी राजकीय सत्ता काबीज करणे अथवा केले पाहिजे यात दुमत नाही,अशावेळी दुर्दम्य इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा व मेहनत या समिकरणाचे संतुलन असणे आवश्यक आहे. अन् एकदा का यांचा मेळ जमला तर कोणाताही दबाव गट असो संघटना विस्तार हा तळागाळापर्यंत पोहोचतोच पोहचतो.
या देशातून फॅसिस्ट शक्तींना राजकीय माध्यमातून मुक्त करावयाचे झाल्यास वर्गलढा व वर्णलढा हातात हात घालून चालवावा लागेल व या फॅसिस्ट शक्तींची स्ट्रॅटेजी नीट समजावून घेतली पाहिजे,आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांना याविषयी जागृत करणे व भूमिका समजावून सांगणे ही ताठर भूमिका असायलाच हवी. लोकशाही, समाजवाद्यांचे तात्त्विक सामाजिक, राजकीय व आर्थिक या क्षेत्रांचा आवर्जून अभ्यास पक्ष, संघटना व समाजनिष्ठा असणाऱ्यांनी करणे गरजेचं आहे.
राजकारणात केलेल्या तडजोडी लोकशाही समाजवादाच्या तत्वांशी विसंगत ठरणार नाहीत,अशी आशा काही काळ करायला हरकत नाही परंतु नुसतेच विनाविचार पदनियुक्ती करत सुटणे, अवास्तव भावनिक आवाहनाची झालर लावून सुटकेचा निःश्वास सोडला म्हणजे लोकशाही समाजवादाशी केलेली तडजोड हा आत्मघात ठरेल,याचीही स्पष्ट जाणीव असली पाहिजे.म्हणून एक जबरदस्त प्रशिक्षित पदाधिकारी केडर कैंम्प मधून निर्माण करुन न विकले जाणारे,तत्वाला मुरड घालून आपल्या तुमड्या न भरणारे एक जबरदस्त संघटन निर्माण होईल हे सिद्ध होईल..!
शेवटी एक वाक्य माझ्या स्मरणात येते...
It may be your interest
To be our master
But how can it be ours
To be yours Salves?
अर्थात:-
आमचे मालक होणे
तुमच्या हिताचे असेल
पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे?
टिप:- सुज्ञास अधिक सांगण्यास न लागे...!
✍️......
*प्रा.शाहिद शेख*
*पश्चिम महाराष्ट्र सचिव*
*AIMIM🇪🇺🇲🇷🇪🇺🇲🇷*
*shahidsafwan05@gmail.com*
No comments:
Post a Comment