जयभीम
६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसूर्य अस्ताला गेला नि देशात अंधार झाला. त्या घटनेला ६४ वर्षे पूर्ण झाली. ज्यांनी स्वयंप्रकाशाने दलितांच्या जीवनात उजेड निर्माण केला त्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलितांच्या जीवनात किती बदल झाला यांचे आँडीट आज करायला हवे.
बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दै. *'मराठा* ' त सलग १४ दिवस अग्रलेख (म्रुत्युलेख) लिहिले, त्यातून बाबासाहेबांच्या जीवन कर्तृत्वाचे अनेक तेजस्वी पैलू समोर आले. पुढे त्या लेखाचे *'दलितांचा बाबा'* या शीर्षकाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले. समस्त दलितांची एकच भावना आहे. आमचा एकच बाप (बाबा) आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ! खरं तर त्यांच्या जीवनसंग्रामावर हजारो लेख ओळीने लिहिता येतील. परंतु शब्दात न पकडता येणारा त्यांचा जीवनसंग्राम आहे. ते विचारवंतांचे विचारवंत आहेत, ते लेखकांचे लेखक आहेत, कवींचे कवी आहेत, सुधारकांचे सुधारक आहेत !
हिंदू धर्मातील लोक एकमेकांना भेटल्यानंतर राम राम, श्रीराम, जय श्रीराम, नमस्ते, नमस्कार आदी शब्दांनी आपल्या मनातील आदरभाव व्यक्त करतात. इंग्लीश लोक 'Good Morning, Good Evening, Good Night आदी समय दर्शक शब्दांचा अभिवादनासाठी वापर करतात. परंतु भारतातील बौद्ध बांधव व डॉ. आंबेडकरांचे अनुयायी परस्परांना *'जय भीम'* शब्दांनी अभिवादन करतात. *'जय भीम'* ह्या एका शब्दावरती विचारवंत, अभ्यासक दीर्घ प्रबंध लिहू शकतात.
बाबासाहेब कोणत्या दैवी शक्तीला मानत नसत. परंतु वेगळ्या अर्थाने ते म्हणायचे की, *'ज्ञान (विद्या), विनय व शील ही माझी तीन दैवते आहेत'.* ज्ञानाला दैवत मानणारे बाबासाहेब जगातले एकमेवच. हजारो वर्षांपासून दलित समाज ज्ञानापासून वंचित होता. त्यांच्या घरात कालपर्यंत पाटी - पेन्सिल नव्हती. अशा समाजात बाबासाहेब जन्मले नि शिकता शिकता इतके प्रकांड पंडित झाले की, सर्व जगाचेच डोळे दिपून गेले. मधमाशी थेंबाथेंबाने मध जमा करते नि मधाचे सुंदर पोळे बनविते. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी इतके ज्ञानकण जमा केले की, त्यांचाच एक विशाल सागर झाला. बाबासाहेब कायदेपंडित होते, अर्थतज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, लेखक होते, पत्रकार होते, उत्तम वक्ते होते. त्यांना हे सर्व कसे शक्य झाले ? तर ते ज्ञानपिपासू होते. ते अधाशासारखी पुस्तके वाचत असायचे. दिवसातील २४ तासांपैकी १८ -२० तास अखंड वाचन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव आदर्श विद्यार्थी ! एखाद्या सार्वजनिक ग्रंथालयात जितके ग्रंथ नसतील इतके ग्रंथ त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात होते. माणसे परदेशात गेली की, परत येताना मौल्यवान वस्तू सोबत आणतात. बाबासाहेब जगातले असले एक नंबरचे वेडे की, ते परदेशातून येताना केवळ पेट्या भरुन पुस्तके आणायचे. त्यांच्यासारखा वाचनवेडा जगात कोणीच नाही. असले वेड त्यांच्या अनुयायांपैकी किती लोकांना आहे ?
बाबासाहेबांचे दुसरे दैवत विनय होते. विनय हे जीवनातील सर्व मूल्यांपैकी सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. काही माणसे पैशांने, पदाने वा किर्तीने थोडी मोठी झाली की सरळ आकाशालाच लाथा मारु लागतात. बाबासाहेब इतके उतले - मातले नाहीत. त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान होता, पण अनाठायी अहंकार नव्हता. *'विद्या विनयेन शोभते'* या वचनाचा त्यांच्याकडे पाहिले की, ह्या वचनाचा गोड प्रत्यय येतो.
बाबासाहेबांचे तिसरे दैवत होते शील. ते जाहीरपणे सांगायचे की, शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायला मला फार अभिमान वाटतो. बाबासाहेब जग फिरले. परंतु त्यांचे पाऊल कधी वाकडे पडले नाही. त्यांचे शील शंभर नंबरी पारदर्शक होते. म्हणून त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकले नाही.
आता प्रश्न असा आहे, बाबासाहेबांच्या पश्चात दलितांमध्ये असले गुण किती आहेत ?
नेहमीच प्रती आंबेडकर जन्माला यावे, अशी चर्चा होत असते. परंतु दुसरे आंबेडकर होणेच शक्य नाही. परंतु त्यांचे आदर्श विचार जिवंत ठेवणारी पिढी तरी आज अस्तित्वात आहे का ?
बाबासाहेब दलित बांधवांना आवर्जून सांगायचे की, ' माझ्या पश्चात जाग्रुतीचा विस्तव कधीही विझवू देऊ नका !' बाबासाहेबांनी आयुष्यभर दलितांमधल्या विझलेल्या निखाऱ्यावर फुंकर मारली व तो प्रज्वलीत केला. त्यामुळेच दलितांमधला मुकनायक आता बोलू लागलाय. सन १९६० पासून तो आजवर दलित जाणिवांच्या हजारो दलितक्रुती ग्रंथरुपात प्रसिद्ध झाल्यात. दलित साहित्याने मराठी साहित्याला ग्रहण लावलंय. जागतिक पातळीवर दलित साहित्याचीच केवळ चर्चा चालू आहे. दलित साहित्यिक बाबासाहेबांचे ज्वालाग्रही विचार पचवून अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहिलाय. याला काही अपवादही आहेत. आंबेडकरवादी साहित्य हे समतेचीच वाट चालत आहे. बाकी आम्ही सगळे 'जय भीम' च बोलतोय. जयभीम आमच्या जीभेवर गोंदलेला शब्द आहे.
मुजफ्फरभाई सय्यद
कार्याध्यक्ष
अ. भा. साहित्य कलामंच
९९६०३२५०५७
वाचा -
बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh..
Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार...
महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED ...
No comments:
Post a Comment