महानतम हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांचे आदर्श जीवन १२ रबिऊल अव्वलचा पवित्र दिवस. या रबिऊल अव्वलच्या महिन्यात १२ तारखेला महानतम अंतिम पैगंबर रहमतुलील आलमिन हजरत मुहम्मद (स.) हे अखिल मानवजातीसाठी दया व क्रुपा बनून अवतरले. ईद - ए - मिलाद या पवित्र दिवशी मुसलमान समुदायाचे लोक अंतिम पैगंबर स. ची सुआठवण उजळवित असतात. या अतिपवित्र दिवशी पैगंबर (स.) च्या सेवेत सर्वजण रममाण होतात. त्यांच्या प्रेमाने प्रत्येक मुसलमानाचे हदय ओतप्रोत भरलेले आहे. या सर्व गोष्टी आपल्या ठिकाणी आदरास पात्र व कदर करण्यासारख्या आहेत. पैगंबर (स.) यांची सुआठवण उजळवित असताना सर्वसाधारणपणे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते ते त्यांनी सांगितलेल्या शांती, सद्भाव, बंधुत्व, समानता व दुष्ट रुढीविरुध्द लढण्याच्या आदर्शाकडे!
आज ईद - ए - मिलादुन्नवी या अत्यंत पवित्र दिवसालाही आम्ही एक परंपरागत प्रदर्शनीय उत्सवाचे स्वरुप देऊन टाकले आहे. याच्या वास्तविक व खऱ्या उद्दिष्टांना पूर्णपणे विसरुन गेलो आहोत.
'खुदाने उस कौम की हालत आज तक नही बदली.'
"न हो खयाल उसे खुद आप अपनी हालत बदलनेका"
आता जेव्हा पैगंबर (स.) चे शुभ स्मरण होत आहे व प्रत्येक मुसलमानाचे लक्ष त्याकडेच आहे. आम्हाला हिच सुसंधी आहे त्यांचे आदर्श आपल्या जीवनात उतरविण्याची. पैगंबर (स.) यांच्या जीवनाचा अभ्यास करताना आपणास असे आढळून येईल की हे एक मानवता, प्रेम व विश्वव्यापक द्रुष्टीकोन ठेवणाऱ्या महानतम व्यक्तीचे जीवन आहे. त्यांच्या नजरेत सर्व समान होते. कोणत्याही एका विशिष्ट गटात अथवा घराण्यात, राष्ट्रात, वंशात अगर एखाद्या विशिष्ट देशाच्या हितात त्यांना
स्वारस्य नव्हते. म्हणूनच त्यांना 'सरवरे कायनात' म्हणजेच 'जगाचे सरदार', 'जगाचे नेते' म्हणून संबोधले जाते.
पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांचे कार्य कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी किंवा राष्ट्रासाठी नव्हते. अखिल मानवजातीसाठी त्यांनी कार्य केले. सर्वश्रेष्ठ अल्लाहाचे त्यांनी कार्य केले. सर्वश्रेष्ठ अल्लाहाने त्यांना 'रहमतुलील आलमीन' बनवून जगाच्या उध्दारासाठी निर्माण केले होते. पैगंबर (स.) यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेची सर्वात मोठी समस्या सोडविण्यातच खर्च केले. त्यांनी केवळ एक काल्पनिक रुपरेषा सादर केली नाही तर उलट त्यांनी या रुपरेषेवर एक जिवंत समाज निर्माण करुन दाखविला. अनेक रानटी व अमानवीय प्रथा अहंकारांनी व शत्रुत्वाने भरलेली मने, पिढ्यानपिढ्या कट्टर दुष्मनी, विखुरलेल्या अवस्थेत असणारे लोक, नैतिकतेचा झालेला अध:पात या सर्व गोष्टींना मूठमाती देऊन मागासलेल्या अरबांना ईश्वराच्या राज्यासमोर आज्ञापूर्वक नतमस्तक होण्यास भाग पाडले. विखुरलेल्या अवस्थेतून त्यांना एकत्र करुन ईश्वर भक्तीच्या आधारावर नैतिकतेची एक नवीन सामाजिक व्यवस्था,नवीन आर्थिक व्यवस्था आणि नवीन राजकीय व्यवस्था त्यांच्या अंध:कारमय जीवनात निर्माण केली.
आज आमच्यापैकी एकापेक्षा एक वरचढ होऊन जगासमोर महानतम अंतिम पैगंबर (स.) यांनी दाखविलेल्या कल्याणकारी व एकमेव अशा साध्या, सोप्या व सरळ मार्गाविषयी बोलत असतात व हाच एकमेव कल्याणकारी मार्ग असल्याची घोषणा करीत असतात. मग तेच जग आम्हाला त्या सरळ व कल्याणकारी मार्गाच्या विरुध्द जात असल्याचे पाहात असते. पैगंबर (स.) यांची पध्दत सत्याधिष्ठीत आहे. त्यांचे जीवन आदर्श जीवन आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आहे. असे असताना आमची वागणूक यांच्याविरुद्ध असते. आमच्या अशा वागण्यास एक मुस्लीमतर हास्यास्पद ठरवित असेल तर दोष कुणाचा ? आम्ही कोणत्या उत्तराने त्याला संतुष्ट करु शकतो बरे ? आज या अंशात अशा वातावरणात खरी आवश्यकता आहे ती या गोष्टीची की या दिवशी पैगंबर (स.) यांच्या शिकवणी व त्यांच्या जीवनआदर्शानुसार चालण्याचा द्रुढ निश्चय करुन त्या कल्याणकारी सरळ व सोप्या मार्गावर इतरांनाही चालण्यास प्रेरित करु तेव्हाच आम्ही ईद - ए - मिलादुन्नबीच्या खऱ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू व हाच या पवित्र दिनाचा संदेश आहे.
● मी अखिल मानव जातीसाठी
दया व क्रुपा बनून अवतरलो आहे.
● आपल्या मुलास चांगले शिक्षण
देण्यापेक्षा दुसरी कोणतीही
मोलाची देणगी पिता देऊ शकत
नाही.
● जो कुणी परधर्मियांचा छळ करतो
तो मलाच छळतो.
● ज्ञान संपादन करा. ज्ञानी माणसास
सत्य किंवा असत्य किंवा न्याय व
अन्यायामधील फरक कळतो.
● आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.
● सबंध रात्रभर प्रार्थना करण्यापेक्षा
रात्रीचा एक तास दुसऱ्यांना ज्ञान
देण्यात खर्च करणे अधिक
चांगले.
(महानतम अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (स.)
मुजफ्फर भाई सय्यद
कार्याध्यक्ष
अ. भा. साहित्य कलामंच
९९६०३२५०५७
वाचा-
No comments:
Post a Comment